पनवेल : उरण तालुक्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांसंदर्भात संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची पनवेल येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः कचरा व्यवस्थापन, आदिवासी वाड्यांमधील पाणीटंचाई आणि रस्त्यांची दुरवस्था या प्रश्नांकडे खासदार बारणे यांचे लक्ष वेधण्यात आले.
भेटीदरम्यान उरण तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती खासदार बारणे यांना देण्यात आली. अनेक गावांमध्ये कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर बनत असून त्यामुळे पर्यावरण आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच काही आदिवासी वाड्यांमध्ये अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब झाली असून वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असल्याची बाबही खासदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. विकासकामांना गती देण्यासाठी या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. बैठकीदरम्यान त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत प्रलंबित प्रश्नांवर तातडीने लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही खासदार बारणे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
उरण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रस्ते विकास या क्षेत्रांमध्ये अधिक गतीने कामे पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे उरण तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
