मुंबई : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने व्यापक तयारी केली असून ‘शून्य जीवितहानी’ हे उद्दिष्ट समोर ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
महापालिका मुख्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, उपमहापौर संजय घाडी, महापौर रितू तावडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुंबईतील पूरनियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, नालेसफाई, दरडप्रवण क्षेत्रांची सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसाठ्यांचे नियोजन करण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी होल्डिंग पाँड्सची कार्यक्षमता, दरडप्रवण भागांतील संरक्षण जाळ्या, तसेच शहरातील मोठ्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे शहरातील एकूण 2000 किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे 1700 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येत मोठी घट झाली असून खड्डे दुरुस्तीवरील खर्चात तब्बल 80 टक्क्यांनी बचत झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
यंदा पाणी उपशाची क्षमता वाढवण्यासाठी मुंबईभर 65 मिनी पंपिंग स्टेशन आणि 934 पंप तैनात करण्यात आले आहेत. या यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने ‘स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली’ सुरू केली असून नियंत्रण कक्षातून सर्व पंपांच्या कार्यप्रणालीवर रिअल टाइम नजर ठेवली जाणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 1000 ‘आपदा मित्र’, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), भारतीय नौदलाची विशेष पथके आणि इतर बचाव यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस, पूरस्थिती किंवा इतर आपत्तींमध्ये तातडीने मदत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारने यंदाचा पावसाळा सुरक्षित, सुकर आणि नागरिकांसाठी कमी त्रासदायक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सर्व यंत्रणांनी एक ‘टीम’ म्हणून काम करून मुंबईकरांना उत्तम सेवा देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केले.
