पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि देशात एक ‘आदर्श शहर’ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत शहराला देशात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून पुढाकार घेत आपला महत्त्वाचा अभिप्राय (फीडबॅक) नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या संदर्भात बोलताना अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले की, स्वच्छ आणि सुंदर शहर घडविणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनी दिलेला अभिप्राय हा शहराच्या कामगिरीचे खरे प्रतिबिंब ठरतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला देशात अग्रक्रमावर नेण्यासाठी नागरिकांनी सकारात्मक सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.
तुमचा अभिप्राय प्रशासनाचे बळ: डॉ. प्रदीप ठेंगल
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नागरिकांच्या सहभागाला स्वच्छता अभियानाचे मुख्य बळ म्हटले आहे. “नागरिकांचा प्रत्येक अभिप्राय प्रशासनाला अधिक प्रभावी नियोजन करण्यास मदत करेल. यामुळे शहर स्वच्छतेच्या प्रयत्नांना मोठी गती मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
असा नोंदवा आपला अभिप्राय:
पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी https://cf.sbmurban.org या अधिकृत संकेतस्थळाला (Website) भेट देऊन विचारण्यात आलेल्या सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन आपला बहुमूल्य अभिप्राय त्वरित नोंदवावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.
