मुंबई(mumbai) : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून २०२६ पासून सुरू होत असून, यंदा प्रथमच विधानभवन प्रवेशासाठी छापील प्रवेशपत्रिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी ‘ई-प्रवेश प्रणाली’अंतर्गत चेहरा पडताळणी (Face Recognition) पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी-कर्मचारी, स्वीय सहायक, माध्यम प्रतिनिधी तसेच अभ्यागतांसह सर्वांसाठी ही प्रणाली लागू असेल.
अधिवेशनादरम्यान गर्दी नियंत्रणात ठेवणे आणि सुरक्षा तपासणी अधिक सुलभ व प्रभावी करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे विधानमंडळ सचिवालयाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील माहिती ई-ऑफिस आणि ई-मेलद्वारे संबंधितांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, सर्वांनी नव्या प्रणालीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
