मुंबई, प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती पूंछ जिल्ह्यातील युवक-युवतींच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भारतीय सैन्यदलाच्या सद्भावना मोहिमेअंतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी राज्यपालांनी शिष्टमंडळातील सर्व युवक-युवतींशी संवाद साधत त्यांची आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्या शैक्षणिक प्रगती, आवडी-निवडी तसेच भविष्यातील ध्येयांविषयी माहिती घेत राज्यपालांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी युवक-युवतींना देशाच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. शिक्षण, कौशल्य विकास आणि राष्ट्रीय एकात्मता यांना प्राधान्य देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
भारतीय सैन्यदलाच्या सद्भावना मोहिमेचा उद्देश सीमावर्ती आणि दुर्गम भागातील युवकांना देशातील विविध राज्यांची सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक प्रगती जवळून अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, परस्पर संवाद आणि देशाबद्दलची बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
भेटीदरम्यान शिष्टमंडळातील सदस्यांनी महाराष्ट्रातील विकासकामे, शैक्षणिक संधी आणि सांस्कृतिक वैविध्याबाबत उत्सुकता व्यक्त केली. राज्यपालांनी त्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरा, विकासाचा प्रवास आणि विविध क्षेत्रांतील प्रगती याविषयी माहिती दिली.
या सदिच्छा भेटीमुळे सीमावर्ती भागातील युवक-युवतींना प्रेरणा मिळण्यासोबतच राष्ट्रीय ऐक्य आणि भावनिक एकात्मतेचा संदेश अधिक बळकट झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
