पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत उन्नत मार्गांचे दिमाखात भूमिपूजन
तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे :
पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून, सन २०३० पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. शहराची वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांना गती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पांतून शासनाला एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी प्राप्त झाला असून, या प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित या तिन्ही उन्नत मार्गांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीचा वेध घेत या तिन्ही उन्नत मार्गांवरून पुढील काळात मेट्रो नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आतापासूनच आवश्यक ते एकत्रित डिझाईन तयार केले असून, यामुळे भविष्यात जेव्हा मेट्रोचे काम सुरू होईल, तेव्हा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व मेट्रोच्या बांधकाम खर्चात किमान ४० टक्क्यांची बचत होईल. नव्या पुरंदर विमानतळाशी कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर शासनाचा भर असून, दिवेघाटात दुहेरी बोगदा तयार करून त्यातून रस्ता व मेट्रो नेण्याचा विचार सुरू आहे. या विमानतळासाठी ५० टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले असून, हा देशाच्या इतिहासातील एक विक्रम आहे. तसेच १७३ किलोमीटरचा बाह्य व ८६ किलोमीटरचा अंतर्गत रिंग रोड पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे शहरातील कोंडी ३० टक्क्यांनी कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील एकूण जीसीसीपैकी जवळपास ३५ टक्के केंद्रे एकट्या पुण्यात उभी राहत आहेत, असे सांगत त्यांनी हे सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न सुटणार: नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची मोठी अडचण असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे उन्नत मार्ग उभारले जात आहेत. मलेशियात विकसित करण्यात आलेल्या ‘अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्समेंट काँक्रिट’ या तंत्रज्ञानामुळे पुलांतील दोन खांबांमधील अंतर ३० मीटरवरून १२० मीटरपर्यंत वाढविणे शक्य झाले आहे. यामुळे एकाच खांबावर रस्ता, पूल आणि मेट्रो अशी अत्याधुनिक रचना उभारता येईल. पुलांची सुरक्षितता आणि गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी रबरी बेअरिंग्ज व एक्स्पान्शन जॉइंट्सच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका, अशा सक्त सूचना त्यांनी कंत्राटदारांना दिल्या.
पुणे-मुंबईतील कोंडी कमी करण्यासाठी सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलपूर या नव्या महामार्गामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी सुमारे ४० ते ४५ टक्के वाहतूक शहराबाहेरूनच वळविली जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. तसेच नाशिक फाटा ते खेड या ८ हजार कोटींच्या प्रकल्पाची निविदा पूर्ण झाली असून, ठाणे ते पुणे आणि पुढे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडणाऱ्या १५ हजार कोटींच्या नव्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पांचे स्वरूप व वैशिष्ट्ये:
पुणे–शिरूर महामार्ग: ५४ किमी मार्गाचा विकास; यात ३१ किमीचा ६ पदरी उन्नत महामार्ग आणि स्थानिक वाहतुकीसाठी समांतर ४ पदरी रस्ता असेल. यामुळे प्रवास वेळ दीड ते दोन तासांवरून ४५ ते ५० मिनिटांवर येईल.
हडपसर–यवत महामार्ग: ३१.५ किमी एकूण लांबी; यात २५ किमीचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग असेल. हा मार्ग पुरंदर विमानतळ आणि पुणे रिंगरोडला जोडला जाईल.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर कॉरिडॉर: ५३ किमी लांबीचा हा प्रकल्प असून यात २६ किमीचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग असेल. यामुळे चाकण औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतुकीला मोठी चालना मिळेल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकल्पांना पुण्याच्या विकासाचे ‘गेम चेंजर’ म्हटले असून यामुळे औद्योगिक पट्ट्याला आधुनिक रस्ते संपर्क मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा मार्ग पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लांबीचा उन्नत मार्ग निर्माण होईल, अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या सोहळ्याला पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अनेक आमदार, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
