प्रतिनिधी | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर मिश्कील शब्दांत टीका केली.
गुलाबराव पाटील म्हणाले, “एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये असताना तब्बल १३ खात्यांचे मंत्रीपद मिळाले होते. एवढं सगळं मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. आता पुन्हा कुठे गेले तर त्यांना नेमकं काय मिळणार आहे?” असे म्हणत त्यांनी खडसेंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यावेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. या भेटीनंतर महाविकास आघाडीतील संभाव्य राजकीय घडामोडी, तसेच खडसेंच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
