लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा ‘ब्राह्मण कार्ड’ खेळत मोठी राजकीय चाल खेळली आहे. समाजवादी पक्षाच्या ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी बसपाने २००७ मधील यशस्वी सामाजिक समीकरणाची पुनरावृत्ती करण्याचा संकेत दिला आहे.
मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये पक्षाने ब्राह्मण समाजातील उमेदवारांना संधी देण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. तसेच २००७ मध्ये ब्राह्मण समाजाच्या पाठिंब्यामुळे बसपाला पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करता आले होते, याची आठवण करून देत २०२७ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
उत्तर प्रदेशातील राजकारणात जातीय समीकरणांना मोठे महत्त्व असल्याने मायावतींच्या या घोषणेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांपूर्वी बसपा, समाजवादी पक्ष आणि भाजप यांच्यातील राजकीय चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
