मुंबई, दि. १७ : बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असून त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. प्रशिक्षण घेत असलेल्या अधिकाऱ्यांनी केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून न राहता ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून विकसित व्हावे आणि नवीन कामगार कायद्यांचे ज्ञान विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
परळ येथील ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित ‘नवीन कामगार संहिता आणि कामगार कायद्यातील बदल’ या विषयावरील चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री फुंडकर म्हणाले की, कामगार विभाग हा शासन आणि समाज यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. कामगारांचे हक्क, त्यांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा तसेच उद्योगांच्या प्रगतीसाठी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी संवेदनशीलतेने, कार्यक्षमतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली पाहिजे.
नवीन कामगार संहितांमुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रात अनेक बदल घडणार असून या बदलांची योग्य माहिती संबंधित घटकांपर्यंत पोहोचविणे ही अधिकारी वर्गाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या संहितांचा लाभ कामगार आणि उद्योग या दोन्ही घटकांना मिळावा यासाठी अधिकारी वर्गाने सक्रिय भूमिका बजावावी, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात संस्थेच्या संचालक रोशनी कदम-पाटील यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करताना नवीन कामगार संहितांच्या अंमलबजावणीत अधिकारी वर्गाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाद्वारे अधिकाऱ्यांना नव्या कायद्यांची सखोल माहिती मिळून त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास राज्यातील विविध विभागांमधून आलेले कामगार विभागाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन कामगार संहितांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित आणि सक्षम अधिकारी वर्ग हीच खरी ताकद असल्याचा संदेश या प्रशिक्षण कार्यक्रमातून देण्यात आला.
ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यातील कामगार प्रशासन अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
