मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सुमारे १८ तास वाहतूक ठप्प झाल्यानंतर या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर तसेच भाजपवर गंभीर आरोप करत टीकेची झोड उठवली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये दर्जापेक्षा कमिशनला अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांमध्ये निकृष्ट कामे होत असून त्याची किंमत सर्वसामान्य जनतेला मोजावी लागत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळण्याची घटना ही त्याच धोरणाचे उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला.
चव्हाण यांनी पुढे सांगितले की, हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गुणवत्तेची तपासणी आणि जबाबदारी निश्चित करण्याऐवजी कंत्राटदारांना मोकळे रान दिले जात आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून अशा घटनांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरड कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, प्रकल्पाच्या दर्जा, देखभाल आणि नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.
