पवित्र पवना नदी बनली ‘रसायन वाहिनी’ प्रदूषणामुळे जलचर संपुष्टात, पिंपरी-चिंचवड मनपाचा पर्यावरण विभाग ‘कुंभकर्णी’ निद्रेत!

पिंपरी-चिंचवड :
उद्योगनगरीची जीवनवाहिनी आणि नागरिकांची तहान भागवणारी पवित्र पवना नदी सध्या प्रदूषण आणि प्रशासकीय अनास्थेच्या गर्तेत सापडली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या नदीत सध्या राजरोसपणे घातक रसायनिक पाणी सोडले जात असून, यामुळे पवना नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. रासायनिक प्रदूषणामुळे नदीतील जलचर केव्हाच संपुष्टात आले असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग मात्र अजूनही ‘कुंभकर्णी’ निद्रेत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

बुधवारी सकाळी पुन्हा नदी फेसाळली
नदीमध्ये रासायनिक पाणी सोडल्यामुळे ती फेसाळण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. बुधवारी सकाळी केजूदेवी बंधारा आणि लगतच्या भागात पुन्हा एकदा नदीचे पात्र पांढऱ्याशुभ्र धोकादायक फेसाने माखलेले दिसून आले. नदीवर आलेला फेसाचा जाड थर पाहून परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नदी आहे की केमिकल वाहून नेणारा नाला? असा उद्विग्न सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मनपाचा पर्यावरण विभाग फक्त ‘पैसे खायला’ आहे का?
पवना नदीचे हे विदारक रूप पाहून पर्यावरण प्रेमींनी थेट पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. “महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग फक्त कागदोपत्री काम करतोय का? त्यांना नदीचे हे प्रदूषण दिसत नाही की ते जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत? हा विभाग केवळ पैसे खायला आणि ठेकेदारांचे खिसे भरायला आहे का?” असा थेट आणि आक्रमक सवाल आता पर्यावरण प्रेमींकडून विचारला जात आहे. ​वारंवार घडणाऱ्या या गंभीर घटनांनंतरही नदीत हे विषारी रासायनिक पाणी कोण सोडतंय, याचा शोध घेण्यास महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

​आयुक्त साहेब, पर्यावरणाच्या गप्पा फक्त भाषणापुरत्याच का?
केवळ पर्यावरणाच्या मोठ्या-मोठ्या गप्पा मारणारे आणि स्वच्छतेचे दावे करणारे महानगरपालिका आयुक्त देखील या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर घटनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत, असेच आता म्हणावे लागेल. प्रशासकीय प्रमुखांची ही उदासीनता शहराच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. जर शहरातील मुख्य पाण्याच्या स्रोताची ही अवस्था असेल, तर नागरिकांनी पिण्याचे शुद्ध पाणी कुठून आणायचे?
​लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या त्या दोषी कंपन्यांवर आणि गुन्हेगारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पिंपरी-चिंचवडकर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा आता शहरवासीयांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *