मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये लोकप्रतिनिधींना फोडून राजकीय समीकरणे बदलण्याचे तंत्र भाजपने अवलंबल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्र असेल, नाहीतर बंगाल, सर्वत्र याच पद्धतीने बेइमानांची पैदास करण्याचे तंत्र भाजपने अवलंबले आहे. पंजाबातही त्यांनी आम आदमी पक्षासारख्या पक्षाचे खासदार फोडले आहेत.”
राऊत यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांचा विशेष उल्लेख करत या राज्यांची ओळख शूर आणि स्वाभिमानी लोकांची भूमी म्हणून असल्याचे सांगितले. मात्र दिल्लीतील सत्ताकेंद्रातून या राज्यांच्या स्वाभिमानावर घाला घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“महाराष्ट्र, बंगाल, पंजाब ही राज्ये म्हणजे शूर व स्वाभिमानी लोकांची भूमी आहे. दिल्लीतील व्यापार मंडळाने या राज्यांतील शौर्य आणि स्वाभिमानाची जणू सुंताच करून टाकली आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.
यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. “या राज्यांतील सत्ताधाऱ्यांनी आपल्या कार्यालयांवर आणि घरांवर बोर्ड लावून सांगावे की, ‘जनहो, आमच्या येथे स्वाभिमानाची सुंता करून मिळेल’,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात खासदार आणि आमदार फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आले आहे. काही खासदार पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाजपवर थेट आरोप केल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
दरम्यान, राऊत यांच्या आरोपांवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या या टीकेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत
