मुंबई(mumbai) : राज्यातील खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
बैठकीत महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील सहा लोहखनिज खाणी राज्याच्या महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळ यांना हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्याकडे केली.
या खाणी राज्य शासनाकडे आल्यास त्या पुढील दोन वर्षांत कार्यान्वित करण्यात येतील आणि २०३० पर्यंत उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील स्टील उद्योगाला चालना मिळून भविष्यात भारताला स्टील निर्यातदार देश म्हणून अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस सतीशचंद्र दुबे, पंकज भोयर, आभा शुक्ला, वीणा कुमारी, भूपिंदर ब्रार, जयश्री भोज, एकनाथ डवले, दिपेंद्रसिंह कुशवाह, गौरव दयाळ, रविश कुमार सिंह तसेच Coal India Limited आणि Western Coalfields Limited यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
