विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई : राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. MPSC आणि इतर भरती प्रक्रियांतील कथित अनियमितता, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान विरोधकांनी “MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “पेपर फोडणाऱ्या सरकारचा निषेध असो” तसेच “पेपरसोबत खासदार फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणा देत सरकारवर टीका केली.

राज्यात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तसेच भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *