मुंबई : दादर प्रभागातील विविध भागांमध्ये आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. काही भागांतील घरांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी प्रभावित भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. पाणी साचलेल्या ठिकाणांचा निचरा तातडीने करण्यात यावा आणि नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
