नवी दिल्ली : देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी E20 इंधनाविरोधातील दावे फेटाळून लावत टीकाकारांना खुले आव्हान दिले आहे.
E20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते, तसेच इंजिनवर विपरीत परिणाम होतो, असे काही दावे केले जात आहेत. मात्र, या सर्व दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “जर E20 पेट्रोलमुळे एखाद्या वाहनाच्या इंजिनचे नुकसान झाल्याचे एक तरी ठोस उदाहरण कोणाकडे असेल, तर ते समोर आणून दाखवावे.” अफवा आणि गैरसमजांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक माहिती आणि अधिकृत चाचण्यांवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्र सरकार देशातील कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक इंधनाला चालना देण्यासाठी इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. E20 पेट्रोलमुळे इंधन आयात खर्च कमी होण्यास, शेतकऱ्यांना इथेनॉल उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
दरम्यान, E20 इंधनाबाबत वाहनधारकांमध्ये असलेल्या शंका आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
