पुणे : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने व्यापक आणि अत्याधुनिक नियोजन केले आहे. “भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची” या ब्रीदवाक्याखाली आजपासून श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी येथे आरोग्य सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ७ जुलै ते २९ जुलै या संपूर्ण वारी कालावधीत पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर आरोग्य सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
आरोग्य विभागाने यंदा १९२ वैद्यकीय पथके, १३३ वैद्यकीय अधिकारी, ३७८ आरोग्य कर्मचारी, ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४४ आरोग्य उपकेंद्रे वारकऱ्यांच्या सेवेत तैनात केली आहेत. याशिवाय पालखी मार्गावर दर दोन किलोमीटरवर रुग्णवाहिका उपलब्ध राहणार असून, पालखीसोबत २४ तास कार्यरत सहा फिरती वैद्यकीय पथके संपूर्ण प्रवासात सेवा देणार आहेत.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी १७६ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये १०८ आपत्कालीन सेवेंतील ALS (Advanced Life Support) आणि BLS (Basic Life Support) रुग्णवाहिका तसेच १०२ सेवेंतील रुग्णवाहिकांचा समावेश आहे.
वारकऱ्यांना प्राथमिक उपचार त्वरित मिळावेत यासाठी ४,५०० औषध किट दिंडी प्रमुखांना वितरित करण्यात येणार आहेत. या किटमध्ये ताप, वेदना, पोटाचे विकार, अॅलर्जी, निर्जलीकरण आणि किरकोळ जखमांवरील उपचारासाठी आवश्यक औषधे, ओआरएस, मलम आणि प्राथमिक उपचार साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.
महिला व बालकांच्या सुविधांवरही विशेष भर देण्यात आला आहे. पालखी मार्गावर १५ निवारा केंद्रे उभारण्यात आली असून येथे विश्रांती, उपचार आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असेल. तसेच स्तनदा माता आणि बालकांसाठी १२ हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले असून स्वतंत्र विश्रांती व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी २०० पाण्याचे टँकर्स आणि ९८ फिलिंग पॉइंट्स कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक टँकरमधील पाण्याची गुणवत्ता तपासल्यानंतरच त्याचा वापर केला जाणार असून, खाजगी टँकर्सच्या तपासणीसाठी दर पाच किलोमीटरवर विशेष तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
अन्नातून पसरणारे आजार रोखण्यासाठी पालखी मार्गावरील हॉटेल्स, ढाबे आणि उपहारगृहांची नियमित तपासणी केली जाणार आहे. शिळे किंवा अस्वच्छ अन्न विक्रीवर नियंत्रण ठेवले जाणार असून, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणीही अनिवार्य करण्यात आली आहे.
यंदाच्या वारीत प्रथमच दीर्घकालीन आरोग्य सुविधांचा विचार करत ‘आषाढी पालखी विकास आराखडा’ तयार करण्यात आला आहे. पालखी मार्गावरील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी अतिदक्षता विभाग (ICU) उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेलाही मोठी चालना मिळणार आहे.
आषाढी वारीदरम्यान प्रत्येक वारकरी सुरक्षित, निरोगी आणि वेळेवर वैद्यकीय सेवांच्या कक्षेत राहावा, यासाठी आरोग्य विभागाने उभारलेली ही सर्वसमावेशक यंत्रणा वारी व्यवस्थापनातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. श्रद्धा, सेवा आणि सुयोग्य नियोजनाचा संगम घडवत यंदाची वारी अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
