नवी दिल्ली : देशातील बहुतांश भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 22 जुलै रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसासोबत ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून मैदानी प्रदेशात पाणी साचणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा, हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचा तसेच नदी, नाले आणि भूस्खलनप्रवण भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
