पुणे :
राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे रस्त्याचा मोठा भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे प्रजिमा क्रमांक ४३ वरील किलोमीटर ४९/६०० येथे जमिनीचा भूभाग खचून रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.
राजगड (वेल्हा) परिसरातील नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी गोहिणी–भुतुंडे–पाल बु.–वाजेघर–खरीव–वेल्हे या मार्गाचा वापर करावा, तर बालवड–शेनवड परिसरातील वाहनांनी शेनवड–पासली–जाधववाडी–भट्टी मार्गे राजगड (वेल्हा) आणि पुण्याकडे प्रवास करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने डोंगराळ भागातील रस्त्यांवर प्रवास करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
