दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन
अहिल्यानगर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर येथे दोन तासांचे मौन आंदोलन केले. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करत विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध नोंदवला.
मौन आंदोलनानंतर अण्णा हजारे हे आपल्या राळेगणसिद्धी या गावी रवाना झाले.
यापूर्वी बुधवारी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि पोलिस कारवाईबद्दल तीव्र खेद व्यक्त केला होता. आंदोलनकर्त्यांमधील नाराजी ही केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून समाजाच्या वेदना आणि अपेक्षांचे प्रतीक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यास सरकार कोसळणार नाही, उलट सरकार अधिक उत्तरदायी आणि प्रभावी ठरेल, असेही अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच आंदोलनकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून विश्वासाचे वातावरण निर्माण करावे आणि सकारात्मक संवादातून या प्रश्नावर तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केले.