संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले
दिल्लीस्थित *कॉकरोच जनता पक्ष (CJP)* यांच्या पुण्यातील हालचालींमुळे निर्माण झालेल्या संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी संयम, समन्वय आणि संवादाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था यशस्वीपणे कायम राखली. चिघळण्याची शक्यता असलेली परिस्थिती पोलिसांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे शांततेत हाताळण्यात आली.
धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान, समस्त हिंदू आघाडीसह विविध हिंदू संघटनांनी या पार्श्वभूमीवर आंदोलन आणि मोर्चाची घोषणा केली होती. मात्र, आंदोलन होण्यापूर्वीच पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे तसेच विविध हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत शहरातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. चर्चेनंतर हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी शहराच्या व्यापक हिताचा विचार करून प्रस्तावित मोर्चा व आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
मिलिंद एकबोटे यांनी संवेदनशील परिस्थिती हाताळताना पुणे पोलिसांनी दाखविलेल्या व्यावसायिकता, संयम आणि तत्परतेचे कौतुक केले. नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील शांतता राखणे हेच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगत, शहरातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
पोलिस प्रशासनाची सक्रिय भूमिका आणि विविध हिंदू संघटनांनी दाखविलेल्या सहकार्यामुळे शहरातील परिस्थिती पूर्णपणे शांत राहिली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून संभाव्य तणाव टाळण्यात पुणे पोलिसांना यश आले.