Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला
पिंपरी- चिंचवड :
पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा म्हणून सुरू करण्यात आलेली पीएमपीएमएलची ई-बस सेवा निगडी डेपोमध्ये मात्र अडचणींच्या गर्तेत सापडली आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द होत आहेत. याची पूर्वकल्पना प्रवाशांना दिली जात नसल्याने दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीएमपीएमएलच्या नियोजनावर आणि माहिती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बसस्थानक हे शहरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. येथून हिंजवडी, वाघोली, कात्रज, भोसरी, आकुर्डी, मामुर्डी, पुणे स्टेशन आणि महापालिका भवन या प्रमुख मार्गांवर दररोज सुमारे १०० ई-बसेस धावतात. मेट्रो फीडर सेवेचाही मोठा भार याच बसेसवर आहे. मात्र, अनेक बस मार्गातच अचानक बंद पडतात. काही बस डेपोतून बाहेर पडण्यापूर्वीच नादुरुस्त होतात. परिणामी नियोजित वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत होते.
फेरी रद्द झाल्यानंतर प्रवाशांना कोणतीही माहिती दिली जात नाही. पुढील बस कधी येणार, याचीही स्पष्ट कल्पना मिळत नाही. स्थानकावरील डिजिटल फलक आणि ध्वनिक्षेपक प्रणालीचा प्रभावी वापर होत नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. अनेकांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागते. वेळेवर कार्यालय, शाळा किंवा महाविद्यालय गाठणे कठीण बनले आहे.
निगडी डेपोमधून दररोज सुमारे ५७ हजार प्रवासी प्रवास करतात. महिन्याला ही संख्या १७ लाख ७६ हजारांपर्यंत पोहोचते. दरमहा सुमारे ७ लाख ९० हजार किलोमीटरचा प्रवास या बसेस करतात. या सेवेतून पीएमपीएमएलला महिन्याला सुमारे अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. एका ई-बसमधून दररोज सरासरी ५५० प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे एक फेरी रद्द झाली तरी शेकडो प्रवाशांचा खोळंबा होतो. त्याचबरोबर पीएमपीएमएललाही महसुलाचे नुकसान सहन करावे लागते.
हिंजवडी आयटी पार्क, वाघोली, हडपसर आणि इतर प्रमुख रोजगार केंद्रांकडे जाणाऱ्या नोकरदारांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. बस उशिरा आल्याने कार्यालयात पोहोचण्यास विलंब होतो. विद्यार्थ्यांच्या तासिका चुकतात. अनेकांना नाईलाजाने रिक्षा किंवा खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा खर्चही वाढत आहे.
प्रवासी चैताली कालदंते म्हणाल्या, “तांत्रिक कारणामुळे बस रद्द होत असेल, तर त्याची माहिती ध्वनिक्षेपक किंवा डिजिटल फलकावर तात्काळ द्यावी. माहितीच मिळत नसल्याने आमचा वेळ वाया जातो आणि मोठा त्रास सहन करावा लागतो.”
याबाबत निगडी डेपोचे व्यवस्थापक यशवंत हिंगे यांनी सांगितले, “बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे काहीवेळा फेरी रद्द करावी लागते. बिघाड तातडीने दूर करून बस पुन्हा सेवेत दाखल केली जाते.”
ई-बस सेवेची नियमित देखभाल करावी, तांत्रिक बिघाडांचे प्रमाण कमी करावे आणि फेऱ्या रद्द झाल्यास प्रवाशांना तत्काळ माहिती देण्यासाठी प्रभावी डिजिटल व ध्वनिक्षेपक व्यवस्था कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.