‘पोलिओमुक्त भारत’ हे आपले सामूहिक ध्येय असून, प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लशीचे दोन थेंब पाजून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती येथे केले. राज्यभर राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना जबाबदारीने पुढे येण्याचे आवाहन केले.
बारामती येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लशीचे दोन थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पोलिओसारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाची सुविधा पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, पालकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
