मुंबई : गेल्या चार दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर सोमवारी (२९ जून) मध्यरात्रीनंतर मुंबईत पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला. शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले, तर सकाळच्या वेळेत वाहतुकीचाही वेग मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अंधेरी, कुर्ला, सायन, दादर, वांद्रे, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मुलुंड, भांडुप, चेंबूर, घाटकोपर आणि इतर उपनगरांमध्ये चांगलीच हजेरी लावली. काही भागांत अवघ्या काही तासांत १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली असून, सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असला तरी रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुरळीत सुरू होती. महानगरपालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून, सखल भागांतील पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी २ जुलैपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर मान्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
सागरी किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी पाणी साचलेल्या रस्त्यांवरून अनावश्यक प्रवास टाळावा, झाडांखाली किंवा कमकुवत संरचनांजवळ उभे राहू नये आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
