मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात पक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेतल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, महाविकास आघाडीतील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोणाचेही नाव न घेता शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “ज्या व्यक्तीने लोकांनी निवडून दिलेलं सरकार पाडलं, ज्याच्यामुळे महाराष्ट्रात राजकीय विश्वासघात झाला, त्याच व्यक्तीच्या छताखाली जाऊन बैठका घेणं हे मोठ्या नेत्यांच्या प्रतिमेला आणि विश्वासार्हतेला धक्का देणारं आहे,” असे ते म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, राजकारणात मतभेद असू शकतात, संवादही होऊ शकतो; मात्र जनतेच्या भावनांचा आणि राजकीय नैतिकतेचा विचार केला गेला पाहिजे. ज्यांच्यावर सरकार पाडल्याचा आरोप आहे, त्यांच्या दालनात जाऊन बैठक घेण्याचा संदेश जनतेमध्ये वेगळाच जातो. त्यामुळे अशा कृतीमुळे मोठ्या नेत्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, शरद पवार हे विधानभवनात एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. या घडामोडीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असून, विरोधकांकडूनही यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
