इंदिरानगर (पवारवाडी) जिल्हा परिषद शाळा धोक्याच्या छायेत; पत्रे उडाले, भिंतींना तडे, डोंगराचा मलबा, धोकादायक पिंपळ आणि अंगणवाडीतील गळतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर… विद्यार्थ्यांना गणेश मंदिरात भरवावी लागत आहे शाळा; नवीन शाळेसाठी जागा देण्याची ग्रामस्थांची मागणी, प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज

नसरापूर प्रतिनिधी :

राज्यात सध्या मुसळधार पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, इमारतींचे नुकसान आणि विविध दुर्घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जीर्ण शाळा व अंगणवाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोर तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर (पवारवाडी) येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीची स्थिती पाहता एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

इंदिरानगर (पवारवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. यंदाच्या मुसळधार पावसात व वादळी वाऱ्यामुळे शाळेचे सिमेंटचे पत्रे उडाले, काही पत्रे फुटली तर भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. पावसाचे पाणी थेट भिंतींमध्ये झिरपल्याने संपूर्ण इमारत ओलसर झाली आहे. अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्या इमारतीत बसविणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा तात्पुरत्या स्वरूपात शेजारील गणेश मंदिरात भरविण्यात येत आहे.

शाळेने याबाबत पंचायत समिती भोरचे गटविकास अधिकारी तसेच नसरापूर ग्रामपंचायतीला लेखी पत्र दिले आहे. ५ जुलै २०२६ रोजी झालेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शाळेचे सिमेंटचे पत्रे उडाले व फुटले असून भिंती पूर्णपणे भिजल्या आहेत. त्यामुळे ७ जुलै २०२६ पासून विद्यार्थ्यांना गणेश मंदिरात बसवून शिक्षण सुरू करण्यात आले आहे. दुरुस्ती पूर्ण होऊन भिंती सुरक्षित झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत हलविण्यात येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मात्र ग्रामस्थांच्या मते, केवळ तात्पुरती दुरुस्ती करून हा प्रश्न सुटणारा नाही. इमारत अत्यंत जुनी झाली असून तिच्या भिंतींना पडलेले तडे, ओलसर झालेली रचना आणि कमकुवत झालेली अवस्था पाहता नवीन शाळेची उभारणी हा एकमेव कायमस्वरूपी पर्याय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शाळेच्या मागील बाजूस डोंगराचा उतार आहे. सततच्या पावसामुळे या भागातील मोठ्या प्रमाणावर माती वाहून गेली आहे. त्यामुळे भविष्यात डोंगराचा मलबा शाळेवर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जर योग्य वेळी संरक्षण भिंत, पाणी निचऱ्याची व्यवस्था किंवा इतर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

याच परिसरातील अंगणवाडीची इमारत नवीन असली तरी तिच्या स्लॅपमधून पावसाचे पाणी झिरपत आहे. संपूर्ण स्लॅप ओला राहत असून इमारतीमध्ये दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे लहान बालकांना अंगणवाडीत बसताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नव्याने बांधलेल्या इमारतीतच अशी अवस्था का निर्माण झाली, वॉटरप्रूफिंगचे काम योग्य प्रकारे झाले की नाही, याबाबत नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. संबंधित बांधकामाची तांत्रिक तपासणी करून दोषी आढळल्यास जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

अंगणवाडीच्या भिंतीलगत वन्यप्राण्यांनी मोठमोठे खड्डे केले आहेत. हा परिसर डोंगरालगत असल्याने रानडुक्कर व इतर वन्यप्राणी येथे वारंवार येतात. त्यामुळे इमारतीच्या पायाभूत सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शाळेसमोरील मोठे पिंपळाचे झाडही विद्यार्थी आणि अंगणवाडीसाठी धोकादायक ठरत आहे. सन २०२५ पासून या झाडाच्या छाटणीसाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी अर्ज देण्यात आले आहेत. मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे हे झाड कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, चेलाडी येथे ज्या पद्धतीने नवीन अंगणवाडी उभारण्यात आली, त्याच परिसरात जिल्हा परिषद शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी उत्कृष्ट आणि आधुनिक जिल्हा परिषद शाळा उभारता येईल. या शाळेचा लाभ इंदिरानगर (पवारवाडी), कातकरी समाजातील विद्यार्थी तसेच परिसरातील इतर छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांनाही होईल. प्रशस्त वर्गखोल्या, सुरक्षित इमारत, खेळाचे मैदान आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम होईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, जर भविष्यात शाळेची इमारत कोसळून, डोंगराचा मलबा येऊन किंवा पिंपळाचे झाड पडून कोणतीही जीवितहानी झाली, तर त्याला संबंधित प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील.

ग्रामस्थांनी नसरापूर ग्रामपंचायत, पंचायत समिती भोर, जिल्हा परिषद पुणे तसेच भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नवीन शाळेसाठी जागा निश्चित करावी, निधी मंजूर करून आधुनिक जिल्हा परिषद शाळेचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. इंदिरानगर (पवारवाडी) येथील शाळेचा प्रश्न हा केवळ एका इमारतीचा नाही, तर अनेक निष्पाप विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे प्रशासनाने आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी परिसरातील नागरिकांची एकमुखी मागणी आहे.

चौकट : प्रशासक सरपंच उषा विक्रम कदम म्हणाल्या…

“इंदिरानगर (पवारवाडी) येथील शाळेची परिस्थिती गंभीर असून या प्रकरणाची तातडीने दखल घेतली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. शाळेचे स्थलांतर करण्याचाही पर्याय पाहिला जाईल. तसेच याच ठिकाणी किंवा दुसऱ्या योग्य जागेवर मोठ्या स्वरूपाची नवीन जिल्हा परिषद शाळा उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *