कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर भाजपने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत, “कांद्यावर अश्रू ढाळण्यापूर्वी शरद पवार यांनी देशाचे कृषिमंत्री असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले याचा हिशेब द्यावा,” अशी मागणी केली.
नवनाथ बन म्हणाले की, आज रोहित पवार कांद्याला २५ रुपये प्रतिकिलो भाव देण्याची मागणी करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, शरद पवार तब्बल दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती वेळा न्याय्य दर मिळाला? त्या काळात अनेकदा कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आणि काही ठिकाणी एक ते दोन रुपये किलो दराने कांदा विकावा लागला होता.
भाजपच्या मते, त्या काळात ना मोठी आंदोलने झाली, ना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एवढी आक्रमक भूमिका घेण्यात आली. आज मात्र शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना केल्या असून कांद्याच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आंदोलन करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना काय केल्या याचे उत्तर रोहित पवार यांनी द्यावे.
“आज आंदोलन आणि काल मौन” अशी भूमिका पवार कुटुंबाची राहिली असल्याचा आरोप करत बन म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका घेऊन जनतेची दिशाभूल करता येणार नाही. महाराष्ट्रातील शेतकरी जागरूक असून त्यांनी भूतकाळातील घडामोडी विसरलेल्या नाहीत.
शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना आणि सकारात्मक भूमिका आवश्यक आहे. मात्र केवळ राजकीय टीका करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करण्याऐवजी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.
