Delhi-सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवणे संविधानाच्या भावनेविरोधात; सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर टीका
नवी दिल्ली : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर या कारवाईवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “दिल्लीत आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आमचे मुख्य प्रवक्ते अनिश गवांडे यांच्याशी माझे बोलणे झाले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, कारण आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने सुरू होते.”
त्या पुढे म्हणाल्या, “मजबूत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असतो. सोनम वांगचुक ज्या शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत होते, त्यांना ज्या प्रकारे तेथून हटवण्यात आले, ते अयोग्य असून संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहे.”
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रतिक्रिया उमटत असून, आंदोलन हाताळण्याच्या पद्धतीवरून केंद्र सरकारवर टीका होत आहे.