तरुणांनो व्यायाम करा… पण जरा जपून! उन्हाच्या तडाख्यात ‘अतिव्यायाम’ ठरेल जीवघेणा; पिंपरी-चिंचवड आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा

​पिंपरी-चिंचवड |
पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचा पारा चाळीशी पार करत आहे. अशा कडाक्याच्या उन्हात फिटनेसच्या वेडापायी तरुण भरउन्हात घाम गाळत आहेत. मात्र, हा अतिउत्साह जीवावर बेतू शकतो. हवामानातील बदलांमुळे शरीरावर येणारा ताण ओळखून व्यायामात बदल करणे आता अनिवार्य झाले आहे, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

​मैदानांवर वाढती गर्दी, वाढता धोका
शहरातील जिम आणि खेळाची मैदाने सध्या गर्दीने फुलली आहेत. पोलीस आणि सैन्य भरतीची तयारी करणारे तरुण कडाक्याच्या उन्हात तासनतास सराव करत आहेत. भरउन्हात धावणे आणि जड व्यायाम केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. कडक उन्हात व्यायाम केल्याने ‘हीट स्ट्रोक’चा धोका वाढतो. चक्कर येणे किंवा शुद्ध हरपण्याचे प्रकार शहरात समोर येत आहेत. शरीराचे तापमान अचानक वाढल्याने अंतर्गत अवयवांवर ताण येतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आरोग्य विभागाची नियमावली:
– ​दुपारी १२ ते ४ या वेळेत मैदानी व्यायाम पूर्णपणे टाळा.
– ​व्यायामाच्या दरम्यान आणि नंतर भरपूर पाणी प्या.
– ​लिंबू सरबत किंवा ताक यांसारख्या नैसर्गिक पेयांचा वापर करा.
– ​प्रोटिन सप्लिमेंट्सचा अतिवापर टाळा, ते किडनीवर ताण आणू शकतात.

​आहार आणि विश्रांतीचा ताळमेळ
व्यायामाइतकाच आहार महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात जड अन्न खाणे टाळावे. मोड आलेली कडधान्ये आणि फळांचा आहारात समावेश करा. पुरेसा आहार न घेता व्यायाम केल्यास तीव्र थकवा जाणवतो. व्यायामानंतर किमान ७ ते ८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. शरीर पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी विश्रांतीची गरज असते. थकलेल्या शरीरावर व्यायामाचा अधिक ताण देऊ नका.

​तज्ज्ञांचा सल्ला
“हवामानाचा विचार करूनच व्यायामाची तीव्रता ठरवावी. शरीर थकण्याचे संकेत देत असेल तर त्वरित थांबावे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणताही अघोरी प्रयोग करू नका,” असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
​फिटनेस महत्त्वाचा आहेच, पण एका दिवसात शरीर बनवण्याच्या नादात आरोग्याशी खेळ करू नका. उन्हाचा चटका कमी होईपर्यंत संयम पाळा आणि सुरक्षित व्यायाम करा.

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १५ : जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत जपानी मेंदूज्वरावरील लसीकरण मोहीम सुरू झाली होती. याच दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले. मात्र, महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली नव्हती. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यावेळी केंद्र सरकाराला विशेष विनंती केली आणि जपानी मेंदूज्वर आजारांवरील लसीकरण मोहीमेला राज्यात सुरुवात केली. या प्रयत्नांमुळे आज रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे.

जपानी मेंदूज्वराची वैशिष्ट्ये आणि धोका
महाराष्ट्रात जपानी मेंदूज्वर या आजाराबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून लसीकरण व नियंत्रण उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. हा आजार प्रामुख्याने डासांद्वारे पसरतो आणि मेंदूवर परिणाम करून गंभीर गुंतागुंत, झटके तसेच मृत्यू होण्याची शक्यता निर्माण करतो. या आजाराचा मृत्यूदर जास्त असून वाचलेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.

राज्यातील सद्यस्थिती
राज्यात २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत रुग्णसंख्या तुलनेने कमी असली तरी काही जिल्ह्यांमध्ये काही प्रकरणे आढळली आहेत. २०२२ मध्ये २ रुग्ण, २०२३ मध्ये ५ रुग्ण, २०२४ मध्ये ५ रुग्ण व २ मृत्यू, २०२५ मध्ये ७ रुग्ण व १ मृत्यू नोंदविण्यात आले, तर २०२६ च्या मार्चपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने रुग्ण आढळले आहेत.

लसीकरण मोहिमेची प्रगती
एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान लसीकरण मोहिमेत राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. पहिल्या डोसचे एकूण कव्हरेज ८९.२६ टक्के तर दुसऱ्या डोसचे ७८.६८ टक्के आहे. धाराशिव (९९.५९ टक्के), लातूर (९७.८४ टक्के) आणि सोलापूर (९५ टक्के पेक्षा जास्त) जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र रायगड ५५ टक्के पहिला डोस व ४८ टक्के दुसरा डोस, पुणे आणि पीसीएमसी भागात दुसऱ्या डोसचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे.

निदान व उपचार सुविधा
राज्यात जपानी मेंदूज्वराच्या निदानासाठी नागपूर, गडचिरोली, सेवाग्राम (वर्धा), भंडारा आणि गोंदिया येथे पाच सेंटीनेल केंद्रे कार्यरत आहेत. तसेच १६ जिल्ह्यांमध्ये बाल अतिदक्षता विभाग (PICU) सुरू असून रुग्णांना आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

विदर्भ भाग सर्वाधिक संवेदनशील
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार विदर्भ हा जपानी मेंदूज्वरासाठी सर्वाधिक संवेदनशील भाग आहे. ग्रामीण व कृषी क्षेत्रात डासांची वाढ, तसेच डुक्कर व पक्ष्यांच्या संपर्कामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. काही शहरी व उपनगरी भागातही साथीचा धोका संभवतो.

नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना
राज्यात नियमित लसीकरण, विशेष मोहिमा, रक्त नमुना तपासणी, डास नियंत्रणासाठी धूरफवारणी, क्यूलेक्स डासांचे सर्वेक्षण, जनजागृती, डासांच्या उत्पत्तीस्थळांवर गप्पी मासे सोडणे तसेच स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत.

जनतेला आवाहन
जपानी मेंदूज्वर हा आजार विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, डासांपासून संरक्षण करावे आणि ताप किंवा मेंदूशी संबंधित लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.