पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – आळंदी येथे एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना ९ जून रोजी घडली. या गुन्ह्यातील तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सोनसाखळीसह १२ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वैष्णव शरद कदम (वय २०), सचिन जालिंदर कदम (वय ४२) आणि विजय ज्ञानेश्वर कदम (वय ३३, तिघेही रा. निरगुडी, हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आळंदी परिसरात एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेली. याबाबत नऊ जून रोजी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करत होते. या पथकाने तिघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींकडून चार लाख 95 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी आणि गुन्ह्याशी संबंधित आठ लाख रुपये किमतीची चार चाकी गाडी आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे.
सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना अटक १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
