पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीतील पाणी अतिशय दूषित झाले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून रखडलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत सर्वपक्षीय बैठक घेऊन स्थानिक शेतकरी, नागरिक आणि विविध संघटनांशी चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केली. पवना नदीत मैलामिश्रित व रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने नदीचे पाणी अत्यंत अशुद्ध झाले आहे. जनावरांचे मांसही नदीपात्रात आढळत असल्याचा दावा त्यांनी केला.
सध्या महापालिका रावेत बंधाऱ्यातून दररोज ५५० एमएलडी पाणी उचलत असून ते शुद्ध करून नागरिकांना पुरवले जाते. मात्र, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बारणे यांनी नमूद केले. बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराला शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
