वाहतूक कोंडी, दुर्गम भाग आणि आपत्कालीन परिस्थितीवर मात; हजारो माता-बालकांसाठी ‘१०८’ ठरली जीवनरेषा
पुणे :
प्रसूतीच्या वेदनांनी तडफडणाऱ्या गर्भवती महिलांसाठी ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा केवळ वाहतूक व्यवस्था राहिलेली नाही, तर ती अनेक कुटुंबांसाठी नवजीवन देणारी जीवनरेषा ठरली आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रसूतीची वेळ आल्याने राज्यभरात तब्बल ४२ हजारांहून अधिक महिलांची सुरक्षित प्रसूती थेट रुग्णवाहिकेत पार पडली आहे. प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हजारो माता आणि नवजात बालकांचे प्राण वाचले असून, आपत्कालीन आरोग्य सेवेमधील हा एक उल्लेखनीय टप्पा मानला जात आहे.
मे २०२६ पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मिळून ४२ हजार ७८६ महिलांनी रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला आहे. अचानक सुरू झालेल्या प्रसूती वेदना, दुर्गम भागातील अंतर आणि शहरांतील वाहतूक कोंडी यामुळे अनेक महिलांना वेळेत रुग्णालय गाठणे शक्य झाले नाही. अशा वेळी ‘१०८’ सेवेमधील डॉक्टर, वैद्यकीय तंत्रज्ञ आणि आपत्कालीन कर्मचारी यांनी प्रसूतीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
अत्याधुनिक आरोग्य सुविधा असलेल्या शहरातही वाहतूक कोंडी मोठे आव्हान ठरते. त्यामुळे अनेक वेळा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रसूतीची वेळ येते. मुंबईत अशा ८३० महिलांनी रुग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती केली आहे. हा आकडा शहरातील आपत्कालीन आरोग्य सेवेचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.
सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यातील महिलांना
या सेवेचा सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यातील महिलांना मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल ३ हजार ८६१ प्रसूती रुग्णवाहिकेत पार पडल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात ३ हजार ३१०, सोलापूरमध्ये २ हजार ४०५ आणि सातारा जिल्ह्यात २ हजार १५१ प्रसूतींची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात १ हजार ८२९ महिलांनी, कोल्हापूरमध्ये १ हजार ७२४ महिलांनी, औरंगाबादमध्ये १ हजार ६८९ महिलांनी तर अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार १४१ महिलांनी रुग्णवाहिका सेवेच्या मदतीने सुरक्षित प्रसूती केली आहे. सिंधुदुर्गसारख्या तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातही २४७ प्रसूती रुग्णवाहिकेत पार पडल्या आहेत.
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ही आकडेवारी राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे वास्तवही दाखवते. मात्र त्याचवेळी आपत्कालीन परिस्थितीत ‘१०८’ सेवा किती प्रभावीपणे काम करत आहे, हे देखील स्पष्ट करते. वेळेशी सुरू असलेल्या शर्यतीत या सेवेमुळे अनेक माता आणि नवजात बालकांना सुरक्षित आयुष्य मिळाले आहे.
गेल्या काही वर्षांत ‘१०८’ सेवेमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि तत्पर प्रतिसाद यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम या यशस्वी प्रसूतींमध्ये दिसून येत आहे. अनेक महिलांसाठी रुग्णवाहिकेच प्रसूतीगृह ठरली. तर हजारो कुटुंबांसाठी ‘१०८’ ही सेवा संकटसमयी धावून येणारी देवदूत ठरली आहे.
राज्याच्या आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेतील ही कामगिरी केवळ आकडेवारी नाही, तर हजारो मातांच्या सुरक्षित मातृत्वाची आणि हजारो नवजात बालकांच्या नवजीवनाची प्रेरणादायी कहाणी आहे.
