मुंबई : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता आक्रमक व हिंसक स्वरूप प्राप्त होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मुंबईतील मंत्रालयासमोर एका कार्यकर्त्याने झाडावर चढून आंदोलन केल्याने काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे, संबंधित कार्यकर्त्याने हातात सुतळी बॉम्बची बॅग घेतली होती. पोलिसांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना घडली. यानंतर तो राष्ट्रगीत म्हणू लागल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
सरकारकडून आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप वाढत असल्याचे दिसून आले. मंत्रालय परिसरातील या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत केली. काही काळ मंत्रालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती.
दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर गंभीर आरोप करत आंदोलनकर्त्यांवरील कारवाईचा निषेध केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनाकारण ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कुलाबा पोलीस ठाण्यात अनेक कार्यकर्त्यांना अडवून ठेवण्यात आले असून झटापटीत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारही मिळाले नसल्याचा दावा तुपकर यांनी केला आहे.
“मुंबईत शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. जखमी कार्यकर्त्यांना तात्काळ उपचार द्या आणि सर्वांना बिनशर्त मुक्त करा. अन्यथा राज्यभरातील हजारो शेतकरी मुंबईकडे कूच करतील. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकार आणि प्रशासनच जबाबदार असेल,” असा इशारा तुपकर यांनी दिला.
तसेच, “शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, आंदोलनाला ग्रामीण भागातही आक्रमक स्वरूप प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि हिवरा आश्रम परिसरातील तलाठी कार्यालयांना आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जालना-खामगाव मार्गावरील चिखलीजवळील टोल नाक्यावरही तोडफोड आणि आग लावल्याची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले असून संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी अपुरी आणि फसवी असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे.
तुपकर यांच्या प्रकृतीची चिंता आणि सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढत असून राज्यातील विविध भागांत शेतकरी संघटनांनी सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
आता सरकार या आंदोलनाची दखल घेऊन चर्चेचा मार्ग स्वीकारते की कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर भूमिका घेते, याकडे राज्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
