Pimpri-Chinchwad-भेसळखोरांवर ‘एफडीए’चा बडगा; शहरातील खाद्यव्यवसायात खळबळ सुट्या तेलाची विक्री थांबली; हॉटेल, रेस्टॉरंट आणि पानटपरी चालकांमध्ये धास्ती

पिंपरी-चिंचवड :
अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या धडक मोहिमेचा परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहरात स्पष्टपणे दिसू लागला आहे. प्रशासनाच्या वाढत्या तपासण्या आणि अचानक होत असलेल्या कारवायांमुळे खाद्यव्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी खबरदारीचा मार्ग स्वीकारला असून बाजारातील व्यवहारातही मोठे बदल दिसून येत आहेत.

शहरातील अनेक किराणा दुकाने, बाजारपेठा आणि लहान व्यावसायिकांकडून विकले जाणारे सुटे खाद्यतेल आता जवळपास गायब झाले आहे. कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी सुट्या तेलाची विक्री थांबवली आहे. काहींनी साठाही हटवला आहे. ग्राहकांना आता पॅकबंद आणि ब्रँडेड तेलावरच अवलंबून राहावे लागत आहे. नियमांचे पालन आणि संशय टाळण्यासाठी व्यापारी अधिक सतर्क झाले आहेत.

एफडीएच्या मोहिमेचा सर्वाधिक परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि फास्टफूड व्यवसायावर झाला आहे. अनेक ठिकाणी स्वयंपाकघरांची स्वच्छता सुधारण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या साठवणुकीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. परवाने, नोंदणी आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे. कर्मचारी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्यावरही भर दिला जात आहे.

गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवरही प्रशासनाची नजर असल्याने अनेक पानटपरी चालकांनी सावध भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर काहींनी संशयास्पद वस्तूंची विक्री थांबवली आहे. त्यामुळे या व्यवसायावरही मोहिमेचा परिणाम जाणवत आहे.

मात्र दुसरीकडे शहरातील अनेक रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, पाणीपुरी केंद्रे आणि हातगाडी व्यवसाय पूर्ववत सुरू असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी स्वच्छतेचे निकष अद्यापही पाळले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशा ठिकाणीही नियमित तपासण्या आणि कठोर कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान, एफडीएच्या पथकाने शहरातील विविध भागांतून दूध, तूप, पनीर, आइस्क्रीम, लस्सी तसेच खाद्यतेलाचे नमुने संकलित केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीत दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

या मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांनाही नियमांचे काटेकोर पालन करण्याची जाणीव झाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने शहरातील अन्न सुरक्षा व्यवस्थेला नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *