नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान महत्त्वपूर्ण राजकीय वक्तव्य करत महायुती किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सध्या कोणत्याही नव्या पक्षाचा समावेश होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, “महायुती आणि एनडीएची सध्याची रचना कायम राहणार असून, कोणत्याही नव्या पक्षाला आघाडीत सामील करून घेण्याचा विचार नाही.”
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या राजकीय चर्चांनाही पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर या शक्यतेबाबत तर्कवितर्क लावले जात होते.
फडणवीस यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे महायुतीतील विद्यमान घटक पक्षांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत मिळाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानावर विरोधक आणि संबंधित राजकीय पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
