Delhi-विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ खासदार चंद्रशेखर आझादांचे संसद परिसरात धरणे आंदोलन
नवी दिल्ली | प्रतिनिधी : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ भीम आर्मीचे संस्थापक आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सोमवारी आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर काही आंदोलक संसद परिसराच्या दिशेने गेल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद यांनी भर पावसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली बसून शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू केले. त्यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध व्यक्त करत, लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असल्याचे सांगितले. आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई होईपर्यंत आपला संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, या घटनेवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.