नवी दिल्ली : दिल्लीतील ‘संसद चलो’ मोर्चानंतर झालेल्या पोलिस कारवाईनंतरही कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलनकर्ते जंतर-मंतरवर ठिय्या देऊन कायम आहेत. मुसळधार पाऊस, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि आंदोलनस्थळी करण्यात आलेल्या कारवाईनंतरही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
मंगळवारी सकाळी स्वयंसेवकांनी आंदोलनस्थळाची स्वच्छता केली. पोलिसांनी सोमवारी आंदोलनस्थळी उभारलेले तंबू आणि इतर तात्पुरती संरचना हटविल्यानंतर केवळ मुख्य व्यासपीठ उरले असून त्यावरील तंबूही फाटलेल्या अवस्थेत दिसून आला.
यावेळी अनेक युवक-युवतींनी CJP संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेत पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीचा अनुभव सांगितला. काही पोलिसांनी नावाच्या बॅजशिवाय आंदोलनकर्त्यांना, महिलांसह, मारहाण केली आणि “दहशतवादी” अशी वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर अभिजीत दिपके यांनी हात जोडून जखमी आंदोलनकर्त्यांची माफी मागितली.
दिपके यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना स्पष्ट केले की, सोशल मीडियावर होत असलेल्या दाव्यांप्रमाणे आंदोलनाचे नेते आंदोलनस्थळ सोडून गेले नव्हते. CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी गेले होते, जेणेकरून या संघर्षावर तोडगा निघू शकेल.
यानंतर एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत दिपके म्हणाले, “विशेषतः पुरुष पोलिसांकडून मारहाण झालेल्या मुलींसह सर्व समर्थकांची मी माफी मागतो. आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण देऊ शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या अमानुष कारवाईपासून तुम्हाला वाचवण्यात माझीही कमी पडली.”
त्यांनी पुढे आरोप केला की, “धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी सरकार विद्यार्थ्यांचे रक्त सांडायलाही तयार आहे.” जखमी आंदोलनकर्त्यांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा, आपण वैयक्तिकरित्या त्यांची माफी मागू, असे आवाहनही त्यांनी केले. “ही लोकशाही नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 24 वा दिवस असल्याचे सांगितले. “सोनम वांगचुक अजूनही आमच्यासाठी लढत आहेत. आम्ही आंदोलन थांबवणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवलेच पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
