पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना
पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, एआय आधारित शेतीसाठी ५०० कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा दिवंगत अजितदादांनी दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात केली होती. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्याचे काम पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सातत्याने केले आहे. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत १ हजार कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे.
या योजनेमुळे विशेषतः ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार असून, ऊस उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ, ३० टक्के पाण्याची बचत तसेच रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेतीचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाचा बारामतीमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, शंकर मांडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त संजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.