धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; जंतर-मंतरवरील ३५ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश
नवी दिल्ली : गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेल्या आंदोलनात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी सातत्याने लावून धरली होती. ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी दिला होता. आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारीही करण्यात आली होती.
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू झालेले हे आंदोलन पुढे मुंबई, राजस्थान, बिहार, गुवाहाटीसह देशातील अनेक राज्यांत पोहोचले. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी सरकारविरोधात निदर्शने करत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली.
आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना केंद्र सरकारवर दबावही वाढत गेला. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या मोठ्या आंदोलनानंतर किंवा सार्वजनिक दबावामुळे केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.