NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवार यांचा सलाम; ‘हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत जंतर-मंतर येथे सलग २८ दिवस सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे कौतुक केले आहे. तरुणाईने दाखवलेली जिद्द आणि अन्यायाविरुद्धचा लढा वाखाणण्याजोगा असल्याचे त्यांनी म्हटले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसेच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिले, त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
“देशातील लोकशाहीने कात टाकली आहे आणि त्याचे श्रेय देशातील युवा पिढीला जाते,” असेही शरद पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले.