Kolhapur-कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरासाठी सुमारे १,५०० कोटींचा विकास आराखडा; अमित शाह यांचे गौरवोद्गार

कोल्हापूर(kolhapur) : दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या निधीतून भव्य कॉरिडॉर आणि विकास प्रकल्प म्हणून विकास केला जाणार असून, ही कोल्हापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

कोल्हापूर येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात बोलताना अमित शाह यांनी श्री अंबाबाई मंदिराचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. देशातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या मंदिराचा विकास झाल्यानंतर देश-विदेशातील भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती नव्याने बळकट होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी सातत्याने आग्रह धरला होता. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा तीर्थक्षेत्राच्या विकासाची कामेही वेगाने सुरू आहेत. या व्यापक विकास आराखड्यामुळे पुढील शंभर वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन भाविकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव करत श्री अंबाबाई मंदिर परिसरातील आधुनिकीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला आजपासून प्रारंभ झाल्याचे सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर आणखी उंचीवर पोहोचेल आणि शहराच्या विकासालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसराचे संवर्धन, सुशोभीकरण, भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रदक्षिणा मार्गाचा विकास, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग, सांस्कृतिक केंद्रे आणि पर्यटनवाढीसाठी विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *