(pimpri chinchwad)-महाळुंगेतील दुर्दैवी घटना; नापास झाल्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज*
*पिंपरी-चिंचवड :*
बारावीच्या परीक्षेच्या निकालाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने १७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना महाळुंगे येथे उघडकीस आली. निकालात अपयश आल्यामुळे ती काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पायल प्रकाश महापात्रा (वय १७, रा. म्हाडा सोसायटी, महाळुंगे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला होता. या परीक्षेत पायल नापास झाली होती. निकालानंतर ती निराश आणि शांत झाली होती. बुधवारी घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
कुटुंबीयांनी वारंवार आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संशय आल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी पायल हिने घरातील छताच्या पंख्याच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने खाली उतरवून चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेनंतर महाळुंगे परिसरात शोककळा पसरली आहे. निकालातील अपयशामुळे विद्यार्थ्यांवर वाढणारा मानसिक ताण पुन्हा एकदा समोर आला आहे. उत्तर महाळुंगे पोलीसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
