‘मिसिंग लिंक’वरून विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल; “₹7 हजार कोटी पाण्यात गेले” हा अपप्रचार

मुंबई | प्रतिनिधी

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रकल्पातील कमान पडलेली नसून वरचा मलबा खाली आल्यामुळे तो भाग प्रभावित झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.

“कुठेही क्रॅक गेलेला नाही. मलबा हटवल्यानंतर अवघ्या 18 तासांत ‘मिसिंग लिंक’ मार्ग पुन्हा पूर्ववत करण्यात आला. मात्र, विरोधकांनी ₹7 हजार कोटी पाण्यात गेल्याचा अपप्रचार सुरू केला,” असा आरोप फडणवीस यांनी केला.

यावेळी विरोधकांवर टीका करताना त्यांनी, “एवढे खोटारडे लोक पैदा झाले आहेत. एक हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील,” अशा शब्दांत हल्लाबोल केला.

अलीकडेच मुसळधार पावसानंतर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील एका भागात मलबा कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत अवघ्या 18 तासांत मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला होता.

दरम्यान, या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *