Pandharpur-आषाढी वारीत ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; सार्वजनिक आरोग्य विभागाची व्यापक यंत्रणा कार्यरत
पंढरपूर(pandharpur)-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी झालेल्या वारकरी भाविकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्यापक आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ ही संकल्पना यंदाच्या वारीत प्रत्यक्षात साकारली जात आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ६४३ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. यामध्ये ३ लाख ८० हजार ४८५ बाह्यरुग्णांवर उपचार, ३ हजार १५८ रुग्णांना आंतररुग्ण सेवा तर ८८३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत.
पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत आयसीयू सुविधा, तीन दिवसांचे महाआरोग्य शिबिर आणि यंदाच्या वारीतील विशेष आकर्षण ठरलेली एअर ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, वारकऱ्यांना तातडीची आणि प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.