मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार?” या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. हे एक मराठीतील वाक्प्रचार असल्याचे सांगत त्यांनी फडणवीसांवर उपरोधिक टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार?’ हा एक वाक्प्रचार आहे. तुम्हाला मराठी येत नसेल, तर विधानसभा अध्यक्षांकडून मराठी शिका.”
ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध राजकीय घडामोडींवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात अप्रत्यक्ष शब्दयुद्ध सुरू आहे. त्यात आता मराठी भाषा आणि वाक्प्रचाराच्या मुद्द्यावरूनही नवा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
