मुंबई(mumbai) दि. २१ जून : जून महिना अर्धा उलटून गेला तरी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून सर्वत्र अस्वस्थ हवामानाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र आता राज्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खंडित झालेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असून येत्या काही दिवसांत तो महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये वेगाने पुढे सरकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
या हवामान बदलामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांना चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकरी, नागरिक तसेच शेतीवर अवलंबून असलेल्या घटकांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सध्या तापमानात वाढ आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त असले तरी मान्सूनच्या पुनरागमनामुळे वातावरणात लवकरच बदल होऊन दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून राज्यात अनेक ठिकाणी सरींची हजेरी लागण्याची चिन्हे आहेत.
