Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत
नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. देशाच्या राजधानीत मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व मराठी मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.
बैठकीदरम्यान प्रतिनिधींनी दिल्लीमध्ये सुमारे साडेचार लाख मराठी भाषिक वास्तव्यास असून त्यांनी राजधानीत स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण केल्याचे सांगितले. मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत संस्थांना राज्य शासनाकडून आर्थिक तसेच संस्थात्मक पाठबळ मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषा विभाग जागतिक स्तरावर मराठीचा विस्तार करण्यासाठी कार्यरत आहे. परदेशात ७५ आंतरराष्ट्रीय मंच आणि देशात ७५ बृहन्महाराष्ट्र मंडळांचे जाळे उभारण्याचे काम सुरू असून, कर्नाटक सीमाभागातील मराठी ग्रंथालयांसाठी दोन कोटी रुपयांच्या अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
दिल्लीतील ३० ते ५० लहान-मोठ्या मराठी मंडळांना एका छत्राखाली आणण्यासाठी ‘मध्यवर्ती समिती’ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या समितीच्या माध्यमातून गणेशोत्सवासह विविध सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला राज्यसभा खासदार रामराव वडकुते, कर्नाटकचे आमदार डॉ. मारोतीराव मुळे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्यासह दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.