मुंबई(mumbai) : मानखुर्द परिसरात तीन मजली चाळीचा एक भाग पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ निष्पाप चिमुकल्यांसह एकूण ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दल, पोलीस, महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
