पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – घेतलेल्या पैशांची परतफेड करूनही आणखी पैशांच्या मागणीसाठी एका 55 वर्षीय महिला ऊसतोड कामगाराचे अपहरण करून तिला खोलीत डांबून ठेवले. हा प्रकार दिघी येथे उघडकीस आला 29 जून ते 1 जुलै दरम्यान घडला आहे.
मालीता रोहिदास राठोड, रोहिदास प्रेम राठोड (दोन्ही रा. घोटा, जि. वाशीम) आणि अनिल चव्हाण (रा. केम, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघे अटकेत आहेत. उषा नागोराव आबाळे (वय 55, रा. चौधरी पार्क, दिघी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला पांढर्या रंगाच्या गाडीतून जबरदस्तीने पळवून नेले, मारहाण केली आणि डांबून ठेवले. फिर्यादीचा मुलगा पोलीस ठाण्यात गेल्याचे समजताच घाबरून आरोपी तिला घेऊन पोलीस ठाण्यात आले. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पैशांच्या वादातून महिलेचे अपहरण; दोन आरोपी अटकेत
