मुंबई : गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव वाचताना राहुल नार्वेकर यांनी मराठी भाषेची अक्षरशः चिरफाड केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. “कागदावर लिहून दिलेलं मराठीही त्यांना नीट वाचता आलं नाही. वाचण्यापूर्वी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, “आशाताईंच्या निधनाचा प्रस्ताव स्वाहिली किंवा हिब्रू भाषेत वाचला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठीही समजलं नाही,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी नार्वेकरांवर निशाणा साधला.
या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनावरून भाषिक वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
